सकाळ रिलीफ फंड - मराठवाडा पूरग्रस्त प्रकल्प २०२५
वर्षानुवर्षे सततचा दुष्काळ व पाणी टंचाई अनुभवलेल्या मराठवाड्यावर अतिवृष्टीमुळे (२०२५ मध्ये) महापुराचे संकट आले होते. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, परभणी, जालना आणि सोलापूरसह राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे नद्यांना (सप्टेंबर २०२५) मध्ये महापूर आला होता. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. अनेक गावांना पुराचा तडाखा बसला होता. याशिवाय अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे गावांचा संपर्क तुटला होता. पुरामुळे शेतांमध्ये चिखल झाला होऊन, खरिपाची पिके उध्वस्त झाली होती. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी शेती व जनावरे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकरी वर्गांबरोबरच सर्वसामान्यांचे जनजीवन प्रभावित झाले होते. त्याचबरोबर पावसामुळे आणि पुराच्या पाण्याने अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये शाळांचे शैक्षणिक व भौतिक साहित्य वाहून गेले होते. तसेच, शाळांच्या वर्गखोल्यांची पडझड व दुरावस्था झाली होती.
महाराष्ट्रात आणि देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व प्रभावित घटकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९४३ पासून 'सकाळ रिलीफ फंड' सामाजिक जाणिवेतून भरीव कार्य सातत्याने करत आहे. आपदग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीकरीता व पुनर्वसनासाठी 'सकाळ रिलीफ फंड' कडून समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा' ला जनसामान्यांबरोबरच समाजातील सर्व स्तरातील आणि विविध क्षेत्रातील घटकांकडून प्रतिसाद मिळाला असून, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था, गृहनिर्माण सोसायटी, नागरी पतसंस्था- क्रेडिट सोसायटी, सामाजिक संघटना, औद्योगिक कंपन्या, कामगार संघटना, माजी सैनिक असोसिएशन, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, स्वयंसेवी संस्था, देवस्थान - मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, अन्नदान मंडळ, हास्ययोग परिवार व ज्येष्ठ नागरिक संघटना आदींनी लाखो रुपयांची मदत केली आहे.
आलेल्या मदतीतून 'सकाळ रिलीफ फंडा' तून करण्यात आलेली तातडीची मदत :-
पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी मदतीचा हात पुढे करून, तातडीची मदत म्हणून सुरुवातीला प्राथमिक टप्प्यात तातडीची मदत म्हणून दैनिक 'सकाळ' चे स्थानिक संपादक व बातमीदार यांच्या सहकार्याने धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील अनुक्रमे भूम, परांडा, माढा व मोहोळ तालुक्यातील १ हजार ३३४ आपदग्रस्त कुटुंबाना (किमान २० दिवस पुरेल असे) जवळपास ३५ टन जीवनावश्यक वस्तूंचे (अन्नधान्य) किटचे वाटप केले आहे. दुसऱ्या टप्प्यात १ हजार मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप केले आहे. यामध्ये स्कूल बॅग, कंपास बॉक्स , ६ वह्या प्रत्येकी, वॉटर बॉटल , लंच बॉक्स, चादर , सतरंजी, टॉवेल व स्वेटर अशा वस्तूंचा समावेश होता.